आ. निलेश राणे यांच्या ट्विट संदर्भात चर्चा करणार : महायुतीचे नेते म्हणून मांडलेली भूमिका योग्यच
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली येथील माझ्या निवासस्थानी ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक हे वैयक्तिक भेटीसाठी आले होते. कोकणात आलेल्या माणसाचे आदरातिथ्य करणे ही आपली संस्कृती आहे. त्या भेटीत राजकीय चर्चा कुठलीही झालेली नाही .केवळ माध्यमांमध्ये चर्चा माझ्या भेटीची झाली, ही दुर्दैवी आहे. जिल्हा बँकेतील बेहिशोबी कर्ज वाटपाबाबत आ. निलेश राणे यांच्या ट्विटबद्दल मी काही बोलणार नाही कारण ते महायुतीचे नेते म्हणून त्यांची भूमिका योग्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी आ. राजन तेली यांनी दिली.
कणकवलीत माजी आ. राजन तेली आणि ठाकरे गटाचे माजी आ. वैभव नाईक यांची सोमवारी भेट झाली होती. त्याबाबत माध्यमांशी बोलताना राजन तेली म्हणाले, माज्या वैयक्तिक जीवनात कोणीही ढवळाढवळ करू नये, नाईक यांच्याशी झालेली भेट राजकीय नसून वैयक्तिक होती. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. या भेटीवरून कोणीही राजकीय अर्थ लावू नये. समाजात वावरताना सर्व पक्षीय नेते आपल्या पक्षाची भूमिका घेवून काम करत असतात. त्यावेळी फक्त कणकवलीत एकमेकांच्या विरोधात सुडाचे राजकारण होत होते. ती परिस्थिती मला बदलायची आहे. त्यामुळे सर्व पक्षीयांसमेवत चांगले संबंध ठेवणे ही एक कोकणातील संस्कृती जपण्यासाठी माझे प्रयत्न असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
आ. निलेश राणेंशी बँकेबद्दल चर्चा करणार
सिंधुदुर्ग बँकेतील संचालक मंडळाकडून होत असलेल्या कर्ज व्यवहाराबाबत मी टीका केल्यानंतर आ. निलेश राणे यांचे ट्विट आले. महायुतीतील नेते म्हणून त्यांची योग्य भूमिका आहे. मात्र, बँकेतील कारभाराबाबत सर्व माहिती त्यांना देऊन मी चर्चा करणार आहे. आपली भूमिका काय आहे आणि त्यामागील विचार काय, हे मी स्वत: आ. निलेश राणे यांच्याशी बोलून स्पष्ट करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले .






