हि निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक – वैभव नाईक
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र. ८८ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष युतीच्या उमेदवार सौ. श्रवरी परब यांच्या प्रचारासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी सांताक्रूझ येथे उपस्थिती दर्शविली. वैभव नाईक प्रचारात सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी युतीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्ष युतीच्या उमेदवार सौ. श्रवरी सदानंद परब यांच्या प्रचाराला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यात कोणतीही शंका नाही. श्रवरी परब यांचे पती सदा परब यांनी या भागात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि विकासात्मक कामे केली आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी शिवसैनिक आणि मनसैनिकच रस्त्यावर उतरून संघर्ष करतात.त्यामुळे मुंबईच्या सुज्ञ मतदारांनी मुंबई महापालिकेची सत्ता हि शिवसेना,मनसे, राष्ट्रवादी युतीच्या हातात द्यावी. या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील मराठी माणूस आशेने बघत आहे. हि निवडणूक फक्त मुंबईची राहिलेली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची ही निवडणूक आहे. मराठी माणूस मुंबईत आणि महाराष्ट्रात ताठ मानेने उभा राहिला पाहिजे यासाठी या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपल्या युतीचे उमेदवार निवडून आणले पाहिजेत असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले. याप्रसंगी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







