शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
कणकवली : प्रतिनिधी
कणकवली शहरात पाच जनावरांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली असून, यामध्ये चार म्हैशी व एका गायीचा समावेश आहे. या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासणीनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी विषबाधेमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पाच जनावरांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने संबंधित शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून आर्थिक नुकसानही झाले आहे.








