ठळक घडामोडी

स्मार्ट मीटरला विरोध: वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणवर एल्गार

“आधी सेवा सुधारा, मग मीटर लावा” – ग्रामस्थांचा ठाम इशारा

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांनी स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात तसेच वीज समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत महावितरण प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आधी वीजपुरवठा सेवा सुरळीत आणि स्मार्ट करा, त्यानंतरच आम्ही स्मार्ट मीटर स्वीकारू,” असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा वेताळ बांबर्डेवासीय ग्रामस्थांनी महावितरणला दिला.
     आज वेताळ बांबर्डे येथील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ओरोस येथील महावितरण उप कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक देत विविध विविध समस्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाढाच वाचून दाखवला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांच्यासह उपसरपंच शैलेश घाटकर, ग्रामपंचायत सदस्य साजूराम नाईक, अवधूत सामंत, योगेश ठाकूर,विलास पवार,संदीप पवार,राहुल सांडव,आनंद घाडी यासंह गावातील प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
     “घर बंद असताना किंवा ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना न देता चोरट्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. हा प्रकार कुठल्या नियमात बसतो?” असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. जर यापुढे ग्राहकाची संमती न घेता किंवा पूर्वसूचना न देता मीटर बसवण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर ‘घुसखोरीचा’ गुन्हा दाखल करू, असा इशाराही प्रसाद गावडेंनी दिला आहे.याशिवाय गावात अतिरिक्त वायरमनची नियुक्ती करण्यात यावा असा आग्रह करत वेताळ बांबर्डे गावाची लोकसंख्या अडीच हजारांच्या वर आहे. एवढ्या मोठ्या गावाची जबाबदारी केवळ एका वायरमनवर टाकणे अन्यायकारक आहे. त्यामुळे गावात तातडीने अतिरिक्त वायरमन देण्याची मागणी देखील करण्यात आली.स्मार्ट मीटर बसविल्यानंतर
बिलांमधील तफावत असून तीन महिन्यांनी बिले दिली गेली. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर येणारी वीज बिले भरमसाठ असून सर्वसामान्य ग्राहकांना त्याची तडजोड करणे कठीण जात आहे. महावितरण प्रशासनाकडे  स्मार्ट मीटर बदलण्याचे कोणतेही ठोस शेड्युल उपलब्ध नसल्याने, प्रशासनाच्या कारभारावर गावडेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आधी यंत्रणा सुधारा, मगच मीटर लावा असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून केवळ कोणाला पोसण्यासाठी तंत्रज्ञान लादणे चुकीचे आहे. गंजलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारा आणि अनियमित वीज पुरवठा या समस्या आधी सोडवाव्यात, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे महावितरण कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आठ दिवसांचा अल्टीमीटर दिला असून ग्रामस्थांच्या समस्यांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता महावितरण प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!