१००% ‘व्हीजीएफ’ (VGF) देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती
सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा आता दररोज सुरू राहणार – मंत्री राणे
वेंगुर्ले : प्रतिनिधी
सिंधुदुर्गवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चिपी (सिंधुदुर्ग) विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. देश विदेशातील पर्यटक येथील पर्यटन अनुभवण्यासाठी येत असतात. मात्र सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा बंद असल्यामुळे त्याचा परिणाम पर्यटनावर होत होता.मात्र आता या शासनाच्या निर्णयामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि खाजगी चालकांना याचा मोठा फायदा होईल. मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान दररोज विमान उपलब्ध झाल्यामुळे व्यापारी उलाढाल वाढण्यास मदत होईल. सण-उत्सवांच्या काळात चाकरमान्यांना आता प्रवासाचा खात्रीशीर पर्याय उपलब्ध असेल.तसेच तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी!
पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चिपी विमानतळावरील विमानसेवेच्या विस्कळीतपणामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत होती. ही सेवा नियमित व्हावी यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केल्याने पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. “सिंधुदुर्गच्या विकासासाठी चिपी विमानतळ हा कणा आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने १००% VGF चा निर्णय घेतला आहे. आता आठवड्यातील सातही दिवस विमान उडणार असून, यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून लवकरच नवीन वेळापत्रकानुसार नियमित विमानफेऱ्या सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









