‘श्री’ पद्धतीच्या भात लागवडीचे मार्गदर्शन; कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र
पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत दत्तकृपा शेतकरी गटाचा पुढाकार
कुडाळ : प्रतिनिधी
सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आवळेगाव- टेंबगाव येथे स्थानिक शेतकरी बांधवांसाठी एक विशेष कृषी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. रासायनिक कीटकनाशकांचा खर्च कमी करून पर्यावरणपूरक शेती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘दशपर्णी अर्क’ निर्मितीचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री’ पद्धतीने भात लागवड कशी करावी, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
हा कार्यक्रम आवळेगावच्या सरपंच सौ. पूर्व सावंत, उपसरपंच श्री. विवेक कुपेरकर आणि मार्गदर्शक श्री. सचिन चोरगे यांच्या विशेष पुढाकारातून व उपस्थितीत पार पडला.
प्रमुख मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके!
‘पाणी फाउंडेशन’ अंतर्गत शेतकऱ्यांचा पुढाकार: या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ‘पाणी फाउंडेशन फार्मर कप’ स्पर्धेत सहभागी असलेल्या टेंबगाव येथील ‘दत्तकृपा कृषी समृद्धी शेतकरी गट’ च्या सदस्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या गटातील सर्व सदस्यांनी एकत्र येत सहाय्यक कृषि अधिकारी आणि agricart farmers producer company sachiv श्री. सचिन चोरगे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वतः ‘दशपर्णी अर्क’ तयार केला.
दशपर्णी अर्क निर्मिती व कीड नियंत्रण!
तालुका कृषी अधिकारी श्री. भास्कर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषि अधिकारी प्रिया खरवडे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क कसा तयार करावा, याची सविस्तर कृती समजावून सांगितली. कडुलिंब, सीताफळ, करंज, रुई, घाणेरी, आणि गुळवेल यांसारख्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानांचा वापर, गोमूत्र, शेण यांच्या मिश्रणातून हा अर्क कसा तयार केला जातो, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. हा अर्क पिकांवरील विविध प्रकारच्या अळ्या आणि कीड नियंत्रणासाठी अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचा उपाय असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘श्री’ पद्धतीची भात लागवड माहिती
भात उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ‘श्री’ लागवड पद्धती बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये गादी वाफ्यावर रोपे तयार करणे, कमी वयाची रोपे उपटून त्यांची एकाच अंतरावर (चौकोनी पद्धतीने) लागवड करणे, आणि आंतरमशागत कशी करावी, याविषयी तांत्रिक माहिती मराठीतून अगदी सोप्या भाषेत देण्यात आली. या पद्धतीने कमी बियाण्यात आणि कमी पाण्यात भाताचे उत्पादन दीड ते दुप्पट घेता येते, असे कृषि अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून गावागावांत शाश्वत शेतीचा प्रसार होत आहे. दत्तकृपा कृषी समृद्धी शेतकरी गटाने घेतलेला हा पुढाकार परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे आवळेगाव आणि परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये सेंद्रिय शेती आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाविषयी मोठा उत्साह पाहायला मिळाला. गावातील बहुसंख्य प्रगतशील शेतकरी व दत्तकृपा गटाचे सदस्य या प्रसंगी तसेच शेतकरी महिला वर्ग उपस्थित होते.









