
शेतकरी नेते राजू शेट्टींसह विनायक राऊत, वैभव नाईक यांची उपस्थिती
विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा; शेतकरी बागायतदारांची मोठी उपस्थिती
सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
कोकणातील आंबा काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यांसाठी तसेच देवगड मधील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात आज देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथे आंबा व काजू बागायतदार, शेतकरी आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले. प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले.
शेतकरी नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक आणि महादेव जानकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह मोठ्या संख्येने बागायतदार शेतकरी व नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सदर प्रकल्प रद्द झालाच पाहीजे अशी जोरदार मागणी यावेळी बागायतदार शेतकऱ्यांनी लावून धरली. या आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दर्शविला. विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी, बागायतदार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.









