ठळक घडामोडी

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र राज्य नवनिर्वाचित खजिनदार पत्रकार परेश राऊत यांचा परभणीत सन्मान!

मालवण : महेश कदम
     पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य खजिनदारपदी पत्रकार परेश राऊत यांची नुकतीच निवड झाली.
      परभणी येथे आयोजित पदग्रहण समारंभात त्यांनी राज्य खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली. या पदग्रहण सोहळ्यास व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के तसेच लोकशाही न्यूज चॅनेलचे संपादक विशाल पाटील, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकलोळ, नरेंद्र देशमुख यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
      पदग्रहण सोहळ्यादरम्यान राज्य कार्यकारिणीचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार परेश राऊत यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राज्याच्या विविध भागांतील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
      पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच पत्रकारांच्या अडचणी, त्यांच्या हक्कांचे प्रश्न आणि पत्रकारिता क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर सातत्याने आवाज उठविण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य खजिनदार म्हणून परेश राऊत यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
      राज्य खजिनदारपदाच्या माध्यमातून संघटनेच्या आर्थिक व्यवस्थापनासोबतच राज्यातील पत्रकारांशी समन्वय साधून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
     परेश राऊत यांच्या निवडीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांसह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यापुर्वीच व्हाईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनिय काम केले. नासिक येथे संपन्न झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला होता.
     परेश राऊत यांनी विद्यार्थी दशेत विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केले होते. शिबीर, अभ्यासवर्ग, मेळावे यातून विद्यार्थी संघटना बळकटीसाठी मोठे योगदान त्यांनी दिले होते. एन. सी. सी . मध्येही त्यांचा उल्लेखनिय कार्यकाल राहिला आहे.शैक्षणिक चळवळी बरोबर सामाजिक, सांस्कृतिक, वाचन चळवळ, यांसह विविध क्षेत्रात त्यांचे योगदान राहिलेले आहे. आजवर त्यांना मुंबई, पुणे,गोवा,कोल्हापूर, सिंधुदुर्ग आदी ठिकाणी सात पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. गेली सलग वीस वर्षे प्रींट मिडिया व डिजिटल मिडिया या क्षेत्रात वार्ताहर, जाहिरात प्रतिनिधी व व्यवस्थापक पदांवर त्यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या पत्रकारितेतील अनुभवाचा आणि संघटनात्मक कार्याचा उपयोग व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्यस्तरीय कार्याला निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!