
गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी
वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांची मागणी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
माळेवाडी ते शिरोडा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच संपूर्ण मार्गावर पुरेशा पथदिव्यांची सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
स गोव्याहून रात्रीच्या वेळी घरी ये-जा करणाऱ्या अनेक तरुणांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर वाढलेली झाडी आणि अंधारामुळे समोरून येणारी वाहने, वळणे तसेच रस्त्यावरील अडथळे स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून, या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने झोपेचे सोंग सोडून तातडीने जागे होत रस्त्यालगतची झाडी साफ करावी तसेच आवश्यक ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांनी केली आहे.
गणेशोत्सवापूर्वीच या मार्गावरील समस्या सोडवून नागरिकांचा प्रवास सुरक्षित करावा, अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवावा लागेल, असा इशाराही प्रथमेश परब यांनी दिला आहे.









